- औरगाबाद जवळ रेल्वेखाली चिरडून १६ मजूर ठार; मजुरांच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ५ लाखांची मदत जाहीर - TheAnchor

Breaking

May 8, 2020

औरगाबाद जवळ रेल्वेखाली चिरडून १६ मजूर ठार; मजुरांच्या कुटूंबीयांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून ५ लाखांची मदत जाहीर

औरंगाबाद: औरंगाबाद जवळ आज पहाटेच्या सुमारास रेल्वेखाली चिरडून १६ मजूर ठार झाले आहे तर २ जण गंभीर जखमी  झाले आहे. बदनापूर-करमाडा रेल्वेमार्गावर सटाणा शिवारात हा भीषण अपघाता झाला असे सूत्रांनी सांगितले. मजूर लॉकडाऊन काळात घरी जात होते, भुसावळकडे गाडी पकडण्यासाठी ते निघाले होते. रुळांवरून निघालेले स्थलांतरित मजुर रात्री झोपी गेले तेव्हा पहाटे एका मालगाडीनं त्यांना चिरडल्यानं १९ मजूरांपैकी १६ मजूर जागीच ठार झाले आहेत. तर सुदैवानं तिघांचे प्राण वाचले आहेत.
Corona-virus
फोटो: माधव ओझा

सर्व मजूर हे मध्यप्रदेश येथील आहेत.औरंगाबादच्या शासकीय महाविद्यालयात मृतदेह उत्तरीय तपसणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख मुख्यमंत्री सहायता निधीतून देण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. परराज्यातील मजूर आणि कामगारांसाठी जास्तीत  जास्त रेल्वे सोडाव्यात यासाठी केंद्राशी सातत्याने बोलत असून लवकरच सर्वांची परतण्याची व्यवस्था होईल. या कामगारांनी धीर सोडू नये असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

राज्यातील हे मजूर जालना भागात एका स्टील कंपनीत कामाला होते आणि जालन्याहून रेल्वे मार्गाने चालत निघाले होते. रेल्वे मार्गावरच झोपल्याने पहाटे मालवाहू रेल्वे अंगावरून गेल्याने १६ जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

गेल्या ४-५ दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध भागातून विशेष श्रमिक रेल्वे सोडण्यात येत आहे. त्यातून सुमारे एक लाख लोक आपापल्या गावी सुखरूप पोहचले आहेत. येणाऱ्या काही दिवसांत राज्यत अडकलेले सर्व श्रमिक व्यवस्थित त्यांच्या त्यांच्या घरी पोहचतील असे नियोजन झाले असून रेल्वेशी सातत्याने समन्वय सुरु आहे. नुकतीच मुंबईहून रेल्वे सोडण्याचा निर्णयही झाला असून त्यामुळेही अनेक मजूर घरी परटतील. मात्र जीवावर उदार होऊन, स्वत:ला संकटात टाकून जोखीम पत्करू नका असे आवाहन परत एकदा मुख्यमंत्र्यांनी केले आहे

परराज्यातील सर्व मजुरांची निवारा व्यवस्था त्या त्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने केली आहे, त्याठिकाणी अगदी  शेवटचा मजूर घरी जाऊस्तोवर आम्ही त्यांची जेवणाची आणि वैद्यकीय उपचाराची सोय करतो आहोत, त्यामुळे आपली निवारा केंद्रे सोडून लगेच बाहेर पडू नका रेल्वे वेळापत्रकाविषयी आपल्याला रेल्वे व सरकारमार्फत व्यवस्थित माहिती दिली जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे