नाशिक| दिअँकर टीम|शासनाने कांद्यासह शेतमालाला हमीभाव द्यावा, शासनाने कांदा शेतकऱ्याला मदत करण्यासोबत महागाई कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात; अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा मा. खा.समीर भुजबळ यांनी दिला. भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली कांद्यासह शेतमालाला हमीभाव मिळण्यासोबत महागाई कमी करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने चांदवड येथे रास्ता रोको करण्यात आला त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड.रविंद्रनाना पगार, आमदार दिलीपकाका बनकर, प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे, माजी आमदार संजय चव्हाण, राज्य महिला आयोग सदस्या दिपीका चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, महिलाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, डॅाक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॅा.योगेश गोसावी, युवती जिल्हाध्यक्षा किशोरी खैरणार, ग्रंथालय सेलचे जिल्हाध्यक्ष विजय पवार, जेष्ठ नागरिक सेलचे जिल्हाध्यक्ष रामा पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, तालुकाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी समीर भुजबळ पुढे म्हणाले की, कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च देखील निघत नाही. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा शेतकऱ्यांनी कांद्याची होळी केली आहे. भाजीपाला व इतर शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने आपल्या शेती पिकांवर नागर फिरविण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यात अवकाळीचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले असून द्राक्ष, कांदा, गहू, भाजीपाला, हरभरासह अनेक पिकांचे मोठ नुकसान झालं आहे. याबाबत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विरोधीपक्षनेते अजितदादा पवार, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. त्यांतर नाफेड मार्फत कांदा खरेदी करण्यात सुरुवात करण्यात आली. ती मोजक्याच ठिकाणी असल्याने त्याचा फायदा अद्यापही शेतकऱ्यांना होताना दिसत नाही. त्यामुळे नाफेडने बाजार समितीत लिलाव प्रक्रियेत सहभागी होऊन कांदा खरेदी करावी अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी शेतकऱ्यांचे मरण हेच भाजप सरकारचे धोरण असल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना केला. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी खचून न जाता धीराने संकटांचा सामना करावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी यापुढील काळात देखील आक्रमक आंदोलने करून सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही असेही जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने चांदवड तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांचा कांदा व अन्य शेतमाल कवडीमोल भावाने विकला जात असून उत्पादन शुल्क देखील वसूल होत नसल्याने सरकारने यात तातडीने बाजार हस्तक्षेप योजना लागू करून कांद्याला २५०० रुपये हमीभाव जाहीर करावा अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने करत आहोत. कांद्याबरोबरच मेथी, कोथंबीर, कोबी व अन्य भाजीपाल्यांचेही भाव रसातळाला गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यामुळे सर्व शेतपिकांना हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
पुढे म्हटले आहे की, भाजप सरकारने घरगुती गॅस, पेट्रोल व डिझेल यांची प्रचंड दरवाढ केली असल्याने मोठ्या प्रमाणात महागाई वाढत आहे. त्यामुळे इंधनाचे भाव तातडीने कमी करून सर्वसामान्य जनतेला दिलासा दयावा तसेच नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसाने शेतमालाचे व अन्य झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून सरकारने तातडीने मदत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच मागण्यांवर त्वरित कार्यवाही करावी अन्यथा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने अधिक तीव्र आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन व सरकारच जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी वसंत पवार, प्रकाश शेळके, खंडेराव आहेर, राजेंद्र सोनवणे, केशव मांडवडे, विजय जाधव, संदिप पवार, दत्ता वाघचौरे, वसंत पवार, सुनिल कबाडे, यशवंत शिरसाट, नवनाथ आहेर, विजय पाटील, भास्कर भगरे, विजय दशपुते, विनोद चव्हाण, विनोद शेलार, ज्ञानेश्वर शेवाळे, हबीब शेख, अनिल काळे, अनिल भोकनळ, रिझवान घासी, शैलेश ठाकरे, दिलीप पाटील, जगदीश पवार, प्रवीण पहिलवान, सलिम रिझवी, उषाताई बच्छाव, पुष्पलता उदावंत, सायरा शेख, वर्षा लिंगायत, सुरेखा नागरे, योगिता पाटील, राजश्री पहिलवान, नर्गिस शेख, फरीदा काजी, संगीता राऊत, कविता पगारे, अपर्णा देशमुख यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी रास्ता रोकोमुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शेतकरी व महिला आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. यावेळी कांदा रस्त्यावर ओतत, सिलेंडर व लाकडाची मोळी, चूल मांडत शासनाच्या धोरणांचा घोषणाबाजी करत तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला.