नाशिक| केंद्र शासन व राज्य शासनाकडून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत देखील पाठपुरावा करुन ते प्रश्न मार्गी लावणेकामी सर्वोतपरी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर मनिषा खत्री यांनी आज सर्व खातेप्रमुखांची बैठक घेतली. त्याप्रसंगी त्याबोलत होत्या.
नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टीने सुरु असलेले विविध प्रकल्प सकारात्मक दृष्टया सुरु ठेवणार असल्याचे बैठकीत सांगितले. त्याचबरोबर सर्व विभागांची प्राथमिक माहिती घेवून त्यांनी सर्व विभागांना त्यांच्या कामकाजाबाबत सादरीकरण करण्याचे आदेश दिले. खातेप्रमुखांनी सर्व कामकाजात पारदर्शकता ठेवावी व प्रत्यक्ष कामात असलेल्या अडचणींबाबत आपल्याशी थेट संपर्क साधावा असे त्यांनी बैठकीत सांगितले. शहर स्वच्छतेला आपले प्राधान्य रहाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आगामी कुंभमेळयांच्या नियोजनाच्या दृष्टीने विभागीय आयुक्त डॉ प्रविण गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांच्या पूर्वीच्या अनुभवानुसार शहर विकासाच्या दृष्टीने नवनविन संकल्पना राबवणार असल्याचेही त्यांनी बैठकीत सांगितले. तसेच आपल्या माध्यमातून नागरीकांना देण्यात येणाऱ्या मूलभूत सुवीधा तत्पर व विनातक्रार देण्यावर आपले प्राधान्य रहाणार असून प्रशासकीय कामकाजात गतिमानता व सुसूत्रता आणणार असल्याचे बैठकीत सांगितले,नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधा आणि त्यांवर नागरिकांच्या प्रतिक्रिया व अभिप्राय याचा अभ्यास करून त्यानुसार कामकाज करण्यावर अधिकाऱ्यांनी भर द्यावा असेही त्यांनी खातेप्रमुखांच्या बैठकीत नमूद केले. बैठकी नंतर मनपा मुख्यालय,राजीव गांधी भवन येथील विविध विभागांना भेटी देऊन पहाणी केली.